Tractor Loan Maharashtra : अलीकडील काही वर्षात मजूर टंचाईमुळे शेतीचा व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे. शेतमजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आता रोजगाराच्या निमित्ताने ग्रामीण भागातून शहराकडे मोठ्या प्रमाणात नवयुवक स्थलांतरित होत असल्याने ग्रामीण भागात शेतीसाठी शेतमजुरांची कमतरता भासू लागली आहे.
यामुळे मजुरीचे दर अव्वाचे सव्वा वाढले आहेत. विशेष म्हणजे मजुरी वाढूनही शेतमजूर मिळत नसल्याने शेती कामे खोळंबत आहेत. यामुळे साहजिकच मजुरांची मनमानी देखील वाढत आहे. यामुळे मात्र विविध संकटांनी आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. अशा परिस्थितीत आता शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाला चालना मिळू लागली आहे.
यंत्राच्या वापराने शेतीमधील सर्व कामे करण्यावर शेतकऱ्यांचा जोर आहे. मशागतीची कामे, पिकांमधील अंतर्मशागतीची कामे, फवारणीची कामे किंवा इतर महत्त्वाची कामे आता ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित यंत्रांच्या सहाय्याने होऊ लागली आहेत. मात्र, ट्रॅक्टर विकत घेणे हे प्रत्येकच शेतकऱ्याला शक्य नाही. यामुळे अनेकांकडे अजूनही ट्रॅक्टर नाही.
परिणामी अशा शेतकऱ्यांना शेती करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता शेतकऱ्यांची ही कटकट दूर होणार असून त्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तब्बल 80 टक्के कर्ज मिळणार आहे. हो ! आता देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
विशेष बाब म्हणजे एसबीआय शेतकऱ्यांना 80 टक्के कर्ज देणार असून ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना केवळ आता 20% रक्कम भरावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एसबीआय कडून दिल्या जाणाऱ्या या कर्जावर व्याजदर खूपच कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ट्रॅक्टर खरेदी करता येणार असून यामुळे त्यांना शेती करताना विशेष मदत मिळणार आहे.
कोणाला मिळणार कर्ज?
या योजनेअंतर्गत केवळ शेतकऱ्यांनाच ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज मिळणार आहे. हे कर्ज केवळ भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. सरासरी वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये असलेल्या शेतकऱ्यांना एसबीआय कडून 80% पर्यंत ट्रॅक्टर खरेदीसाठी लोन मिळणार आहे. किमान दोन एकर जमीन असलेलले शेतकरीच या कर्जासाठी पात्र राहणार आहेत. पण दहा लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना एसबीआय ट्रॅक्टर खरेदीसाठी लोन देणार नाही.
कोण-कोणती कागदपत्रे लागणार
ट्रॅक्टरसाठी कर्ज घेताना एसबीआय काही कागदपत्रे विचारते. यात अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड, जमिनीशी संबंधित कागदपत्रे, रहिवासी प्रमाणपत्र, 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, मोबाईल क्रमांक आणि दोन पासपोर्ट फोटो यांसारख्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता राहणार आहे.
अर्ज कुठे करावा लागणार?
यासाठी शेतकरी बांधव त्यांच्या जवळील बँकेत संपर्क साधू शकता. बँकेत गेल्यानंतर यासाठी अर्ज सादर करावा लागेल. यात अर्जदार शेतकऱ्याला नाव, पत्ता, आधार क्रमांक, पॅन क्रमांक यांसारखी महत्त्वाची माहिती भरावी लागणार आहे. मग फॉर्म भरल्यानंतर फॉर्म बँकेत जमा करावा लागेल. बँक मग फॉर्म तपासेल आणि कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले जाईल.