Pune Nashik Railway : पुणे आणि नासिक पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. पुणे, मुंबई आणि नासिक या सुवर्ण त्रीकोणातील ही दोन महत्त्वाची शहरे राज्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावतात. मात्र पुणे आणि मुंबईच्या तुलनेत नाशिक शहराचा विकास हा खूपच कासव गतीने सुरू आहे.
विशेष बाब म्हणजे पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करण्यासाठी अजून रेल्वे मार्गच नाहीये. ही दोन्ही शहरे लोहमार्गाने अजूनही जोडली गेलेली नाहीत. सध्या स्थितीला नाशिकहून पुण्याला जर प्रवास करायचा असेल तर नागरिकांना एक तर बसने प्रवास करावा लागतो नाहीतर मग खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
यामुळे नासिक ते पुणे दरम्यान रेल्वे मार्ग विकसित केला गेला पाहिजे अशी मागणी दोन्ही शहरातील नागरिकांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरत आहे. वास्तविक पुणे ते नाशिक प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. पण तरीही या दोन्ही शहरादरम्यान थेट रेल्वे मार्ग सुरू झालेला नाही.
मात्र आता ही दोन्ही शहरे रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. या दोन्ही शहरादरम्यान सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प विकसित केला जाणार आहे. हा प्रकल्प महारेलच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाबाबत नुकत्याच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली होती.
त्यावेळी पवार यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रकल्पासाठी भूसंपादन करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे आदेश देखील दिले होते. अशातच आता या रेल्वे मार्गांबाबत एक महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
खरंतर हा प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेकडे या प्रकल्पाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मध्य रेल्वे आता या प्रकल्पामधील त्रुटी दूर करून याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आणि पंतप्रधान कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
खरंतर या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील खोडद या ठिकाणी एक अडचण आहे. खोडद येथे जीएमआरटी प्रकल्प आहे आणि येथूनच हा रेल्वेप्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे आता या प्रकल्पासाठीची ही अडचण सोडवल्यानंतरच या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू होईल अशी शक्यता आहे.
कसा असेल हा प्रकल्प
हा 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग राहणार आहे. हा प्रकल्प नासिक, अहमदनगर आणि पुणे या तीन शहरांना जोडेल. यामुळे या तिन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान होणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 16 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
या रेल्वे मार्गावर एकूण 20 स्टेशन विकसित केली जाणार असून यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास फक्त पावणे दोन तासात पूर्ण करता येईल असा आशावाद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर ताशी 200 किलोमीटर वेगाने रेल्वे धावण्यास सक्षमराहणार आहे.