Mumbai News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईमधील एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग दिवाळीपर्यंत सुरू होणार आहे. यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास आणखी गतिमान होणार आहे. यामुळे शहरातील आणि उपनगरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मुंबईमधील नेरूळ ते उरण या रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे.
सध्या स्थितीला या रेल्वेमार्गापैकी नेरूळ ते खारकोपर या मार्गाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावर लोकल सेवा देखील सुरू झाली आहे. पण खारकोपर ते उरण या मार्गाचे काम पूर्ण झालेले असतानाही या मार्गावर अद्याप नियमित लोकल सेवा सुरू झालेले नाही. यामुळे उरणकरांना या मार्गावर लोकल केव्हा सुरू होणार हा मोठा प्रश्न पडला आहे. खरंतर पाच महिन्यांपूर्वी या मार्गावर चाचणी घेण्यात आली आहे. चाचणी दरम्यान नेरुळ येथून सुटलेली रेल्वे थेट उरण पर्यंत धावली होती.
यानिमित्ताने उरणमध्ये पहिल्यांदाच रेल्वे दाखल झाली होती. मात्र चाचणी होऊन जवळपास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे तरी देखील या मार्गावर नियमित रेल्वे सेवा सुरू होत नाहीये. मार्च 2023 मध्ये खारकोपर ते उरण या मार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर खारकोपर ते उरण दरम्यानच्या मार्गावर ट्रायल म्हणून रेल्वे चालवण्यात आली होती. पण चाचणीत या मार्गावर काही त्रुट्या आढळून आल्या. दरम्यान या त्रुटी दूर करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहे.
याशिवाय, या मार्गावर काही तांत्रिक कामे सुचवण्यात आली आहेत. ती तांत्रिक कामे देखील सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या सर्व कामांसाठी मात्र दिवाळीपर्यंतचा कालावधी लागणार आहे. अर्थातच नेरूळ ते उरण हा संपूर्ण रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी दिवाळीपर्यंत उरणकरांना वाट पहावी लागणार आहे.
सध्या स्थितीला नेरूळ ते खारकोपर दरम्यान धावणारी ट्रेन उरण पर्यंत पोहोचण्यासाठी दिवाळीपर्यंतचा कालावधी लागणार असून दिवाळीनंतरच खारकोपर ते उरण दरम्यान रेल्वे सेवा सुरू होईल अशी माहिती आता समोर येत आहे.
दिवाळीपर्यंत ही सर्व कामे होतील आणि त्यानंतर खारकोपर ते उरण मार्गांवर पुन्हा एकदा ट्रायल रन घेतली जाईल. ही ट्रायल रन यशस्वी ठरल्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गाचे उद्घाटन करणार अशी माहिती समोर आली आहे. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर सीएसएमटी ते उरणपर्यंत थेट रेल्वेने प्रवास करता येणार आहे.