Maharashtra Toll Rate : एक ऑक्टोबर पासून राज्य शासनाच्या माध्यमातून विविध निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच महत्त्वाचा टोलनाक्यांवरील टोलदरात देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई शहरात एंट्री करताना लागणाऱ्या पाच टोलनाक्यावरील टोलच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राजधानी मुंबई शहरात नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना एन्ट्री करणे महागणार असल्याचे चित्र आहे.
किती वाढणार टोलचे दर?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राजधानी मुंबई शहराच्या वेशीवर असलेल्या पाच टोलनाक्याच्या टोल दरात वाढ केली जाणार आहे. याबाबतची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वीच झाली होती. पण याची अंमलबजावणी ही एक ऑक्टोबर पासून म्हणजेच आजपासून केली जाणार आहे. वास्तविक दर तीन वर्षांनी टोल दरात वाढ केली जाते. यापूर्वी 2020 मध्ये टोल दरात वाढ करण्यात आली होती.
आता 2023 मध्ये पुन्हा एकदा टोल दरात वाढ केली जाणार आहे. याचाच अर्थ टोल दरात नियमानुसार वाढ केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईच्या वेशीवरील ऐरोली, दहिसर पच्छिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड, लाल बहाद्दूर शास्त्री मुलुंड ठाणे, वाशी सायन पनवेल महामार्गावरील टोल नाक्यांवर पाच रुपयांपासून ते 30 रुपयांपर्यंत वाढ केली जाणार आहे.
नागरिकांमध्ये नाराजी
खरतर टोल दरात होणारी ही वाढ नियमानुसार आहे यात शंका नाही. पण टोल आकारला जात असला तरी देखील प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा मात्र जेमतेम आहेत. यामुळे ज्याप्रमाणे टोल वाढवला जात आहे त्याप्रमाणे सुविधा देखील वाढवणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे मत आहे. म्हणून टोल दरवाढीच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
आता किती टोल द्यावा लागणार
2020 पासून आतापर्यंत कारसाठी 40 रुपये आकारले जात होते मात्र आता यामध्ये पाच रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजे आता कार साठी 45 रुपये टोल भरावा लागणार आहे.
मिनी बससाठी आतापर्यंत 65 रुपये टोल भरावा लागत होता मात्र आज पासून पण आज पासून 75 रुपये टोल भरावा लागणार आहे. म्हणजेच मिनीबस साठी दहा रुपये टोल वाढ करण्यात आली आहे.
ट्रक/बससाठी आतापर्यंत 130 रुपये आकारले जात होते मात्र आज पासून यामध्ये 20 रुपयांची वाढ करण्यात आली असून ट्रक आणि बस साठी आता 150 रुपये टोल भरावा लागणार आहे.
अवजड वाहनासाठी आतापर्यंत 160 रुपये आकारले जात होते मात्र आजपासून यामध्ये 30 रुपयांची वाढ झाली असून प्रवाशांना आता अवजड वाहनांसाठी 190 रुपये टोल भरावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय या टोलनाक्यांवर आतापर्यंत पंधराशे रुपयात मासिक पास मिळत होता मात्र यामध्ये आता शंभर रुपयांची वाढ करण्यात आली असून मासिक पास आजपासून सोळाशे रुपयांना मिळणार आहे.